January 28, 2012
natakbaba
एकांकिका कलावंतांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा गौरव
स्पर्धेपलीकडचा, तरुणाईचा एकत्रित कलाविष्कार. निमित्त पुरस्कारांचे, स्पर्धेशिवाय एकत्र येण्याचे
मराठी एकांकिका क्षेत्रातील गुणवत्तेचा सन्मान करणारा “पारंगत सन्मान” पुरस्कार ”अस्तित्व” मुंबई यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सादर झालेल्या एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य व संगीत असे पुरस्कार खुल्या व महाविध्यालयीन अशा दोन गटांत देण्यात येतील. एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून दरवर्षी मराठी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात येउन मिळणारी रंगकर्मींची मोठी फळी हि मराठी रंगभूमीच्या जिवंतपणाचे, सळसळत्या उर्जेचे गमक आहे. नवा प्रेक्षकवर्ग सातत्याने निर्माण करणाऱ्या एकांकिका स्पर्धांचा माहौल हा वर्षानुवर्ष चर्चेचा विषय ठरतो.
अखंडपणे चालणाऱ्या ह्या स्पर्धा विश्वात प्रत्येक स्पर्धेत चुरस ही असतेच,वर्षभरातल्या स्पर्धांनंतर सर्वोत्तम स्पर्धकांच्या ही स्पर्धा भरवल्या जातात. पण ह्या साऱ्यामध्ये “स्पर्धा” हा एकच घटक टोकाचा ठरत असल्यामुळे ह्या सृजनशील मंडळींमध्ये एक प्रकारचा दुरावा अनुभवायला मिळतो. “जिंकणाऱ्यांची दिवाळी आणि आणि बाकी होळी” हे चित्र कुठेतरी बदलायला हवं आणि या एकांकिकांच्या वर्षभरातल्या कामगिरीचे मूल्यमापन व्हावे अशी गरज अनेक ज्येष्ठ रंगकर्मींनी बोलून दाखवली होती.
हाच विचार डोळ्यासमोर ठेवून एकांकिका कलावंतांना कुठल्याही स्पर्धेशिवाय एकत्र आणून त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा गौरव करावा यासाठी “अस्तित्व”ने मागील तीन वर्षापासून “पारंगत एकांकिका सन्मान” संध्येचा प्रारंभ केला. मागच्या वर्षी मुंबई,पुणे,कोकण,औरंगाबाद,सांगली,नाशिक भागातल्या एकांकिका स्पर्धकांनी त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच प्रसारमाध्यमांनी ह्या उपक्रमाला भरभरून दाद दिली. यंदा पारंगत सन्मान संध्येचे आयोजन शनिवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ प्रभादेवीच्या पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटर मध्ये करण्यात आले आहे. या पारंगत सन्मान पुरस्कारासाठी दि. ०१ फेब्रुवारी २०११ ते ३१ जानेवारी २०१२ दरम्यान प्रथम पुरस्कारप्राप्त एकांकिका तसेच वैयक्तिक स्वरुपात पारितोषिकप्राप्त कलावंत आणि तंत्रज्ञ पात्र असतील. या पुरस्कारांचे प्रवेश अर्ज www.astitva.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२१०४४८६२.
प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१२ आहे.
पुरस्कारांची नामांकन २० फेब्रुवारी २०१२ रोजी जाहीर होतील.